शेळी चोरल्याचा संशय, तरुणांना लटकवून मारहाण...
- Get link
- X
- Other Apps
शेळी चोरल्याचा संशय, 4 तरुणांना झाडाला लटकवून बेदम मारहाण, अहमदनगर हादरलं
शेळी चोरी केल्याच्या संशयावरून चार तरुणांना बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना अहमदनगर जिल्ह्यात घडली आहे.
पुरोगामी महाराष्ट्राला लाजवणारी घटना अहमदनगर जिल्ह्यात घडली आहे. शेळी चोरी केल्याच्या संशयावरून श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथील चार तरुणांना झाडाला उलटं बांधून अमानुष मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळं जिल्ह्यातून संताप व्यक्त होत आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथील नाना गलांडे यांची काही दिवसापूर्वी शेळी व काही कबुतर चोरीला गेले होते. या चोरीच्या संशयावरून काल शुक्रवारी सकाळी चार तरुणांना त्यांच्या घरातून नेण्यात आलं. त्यानंतर कपडे काढून त्यांना झाडाला उलटे लटकवून अमानुष मारहाण करण्यात आली आहे. या घटनेत हे तरुण गंभीर जखमी झाले आहेत. जखमी तरुणांना श्रीरामपूर येथील कामगार हाॅस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणातील आरोपींना तातडीनं अटक केली जावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
मिळत असलेल्या माहितीप्रमाणे संशयीत आरोपी युवराज गलांडे ,नानासाहेब गलांडे, राजू बोरगे, राजेंद्र पारखे, मनोज बोडखे आणी दुर्गेश वैद्य यांनी केवळ चोरीचा संशय होता म्हणून या तरुणांना झाडाला लटकून निर्दयपणे मारहाण केली आहे. या तरुणांची आई जेव्हा तरुणांना वाचवण्यासाठी गेली तेव्हा तिला देखील धक्काबुक्की करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांनी हाॅस्पीटलमध्ये जावून या तरुणांची भेट घेतली आहे. संबधीत मारहाण करणाऱ्यांवर श्रीरामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment